महिला कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यात TCS अव्वल!
कितीही शिकल्या तरी लग्न, संसार, गर्भारपण, मुलंबाळं, जबाबदाऱ्या या सगळ्यांमुळे आजही अनेक ठिकाणी मुलींना संधी डावलली जाते. कर्मचारी भरती करताना पात्रता असूनही केवळ महिला असल्यामुळे निवड केली जात नाही. पण टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस अर्थात TCS मध्ये वेगळी परिस्थिती आहे. देशात सर्वांत जास्त महिला कर्मचाऱ्यांची संख्या टीसीएसमध्येच असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. टीसीएस ही देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. सर्वांत जास्त महिला कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यात प्राधान्य देणारी कंपनी टीसीएस असल्याचं बुर्गुन्ड्री प्रायव्हेट लिमिटेड आणि हुरून यांनी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे.
या सर्वेक्षणातून सर्वाधिक महिला कर्मचारी असलेल्या १० कंपन्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये टीसीएसनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे इन्फोसिस (Infosys) त्यानंतर विप्रो (Wipro), एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL Technologies), रिलायन्स इंडस्ट्रीज ( Reliance Industries), टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) यांचाही या यादीत समावेश आहे. या कंपन्यांनी गेल्या वर्षभरात तीन लाख ९० हजार नवीन नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व कंपन्यांमध्ये आधीपासूनच ११ लाख ६० हजार महिला कर्मचारी काम करत होत्या, असंही सर्व्हेमध्ये म्हटलं आहे.
टीसीएसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाख १० हजार म्हणजे जवळपास ३५ टक्के आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या टीसीएसपाच लाख ९२ हजार १९५ कर्मचारी आहेत. त्यातील 35 टक्के महिला असल्याचं समोर आलं आहे. टक्केवारीचा विचार केला तर इन्फोसिसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या ४० टक्के आहे. इन्फोसिसमध्ये सव्वालाख महिला कर्मचारी काम करतात तर विप्रोमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या ८८ हजार ९४६ आहे. एचसीएलमध्ये ६२ हजार ७८० तर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ६२ हजार ५६० महिला कर्मचारी आहेत. टेक महिंद्रा या कंपनीमध्ये ४२ हजार ७७४ आयसीआयसीआय बँकेत ३२ हजार ६९७ तर एचडीएफसी बँकेत २२ हजार ७५० आणि पेज इंडस्ट्री या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांची संख्या २२ हजार ६३१ असल्याचं या सर्वेक्षणातील आकडेवारीवरून समोर आलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अर्थात कंपन्यांच्या संचालक मंडळावर महिलांचं प्रमाण किती आहे याचीही माहिती यातून मिळते. कंपन्यांच्या संचालक मंडळावर १६ टक्के महिला असल्याचं लक्षात आलं आहे. भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचं प्रमाणही वाढत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात संचालक मंडळावरही महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. संचालक मंडळात महिलांची संख्या जास्त असणाऱ्या चार कंपन्या आहेत. गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स , अपोलो हॉस्पिटल एंटरप्राईज, गोदरेज एग्रोव्हेट आणि इंडिया सिमेंट्स या कंपन्यांच्या संचालक मंडळामध्ये प्रत्येकी पाच महिला आहेत. सर्व्हेमध्ये अभ्यास करण्यात आलेल्या एकूण ५०० कंपन्यांमध्ये ६४४ महिला संचालक मंडळावर आहेत.
या सर्वेक्षणासाठी बुर्गुन्ड्री प्रायव्हेट आणि हुरून इंडियाने देशभरातील ५०० कंपन्यांचा अभ्यास केला होता. यामध्ये फक्त भारतात ज्यांची मुख्यालयं आहेत त्यांचाच समावेश करण्यात आला होता. परदेशी कंपन्या किंवा परदेशी कंपन्यांच्या उपकंपन्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. तसंच ज्या कंपन्यांचे किमान मूल्य ५,६०० कोटी रुपये आहे अशाच कंपन्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.
मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातही मुली उच्च शिक्षण घेत आहेत. कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे ही सकारात्मक गोष्ट आहे. पण त्याचं प्रमाण आणखी वाढायला हवं. आजही स्त्री कर्मचाऱ्याला नोकरी देताना अनेक प्रश्न विचारले जातात. तिचं लग्न, गर्भारपण, मुलंबाळं हे तिच्या करिअरमध्ये अडथळा ठरत आहे. शिफ्टमध्ये काम करताना, प्रमोशन देताना, विशेष जबाबदारी देताना तिचं स्त्री असणं आड येतं. अगदी मोठमोठ्या नावाजलेल्या कंपन्यांमध्येही स्त्री कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जात नाही हे वास्तव आहे.
लग्नानंतरही मुलींच्या करिअरमध्ये फरक पडू नये यासाठी प्रत्येक कंपनीमध्ये तसं वातावरण असणं गरजेचं आहे. त्यात बाळंतपणानंतर तर अनेक स्त्रियांच्या करिअरला ब्रेकच लागतो. एकतर तिला नव्याने सुरुवात करावी लागते किंवा करिअरमध्ये ब्रेक घ्यावा लागतो. यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला कर्मचाऱ्यांची फक्त संख्या वाढून उपयोगी नाही तर त्यांच्यासाठी पोषक वातावरणही असायला हवं. स्त्री म्हणून विचार करण्याऐवजी शिक्षण, अनुभव, पात्रता यांचाही विचार केला जाणं आवश्यक आहे. काही जबाबादाऱ्या पार पाडताना स्त्री कर्मचाऱ्यांना अपराधी वाटू नये यासाठी काही किमान सोयीसुविधा मिळवून देण्याचाही विचार केला पाहिजे. महिलांची कर्मचाऱ्यांची संख्या वाढणं ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही सकारातत्मक बाब समजली जाते. आता या परिस्थितीत बदल होऊ लागला आहे. महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. ती अगदी वरच्या स्तरापर्यंतही वाढत जावी इतकीच अपेक्षा!




Comments (0)
Facebook Comments (0)