पुणे - मुंबई प्रवास केवळ अडीच तासांत शक्य?
पुणे - मुंबई प्रवास हा अवघ्या अडीच तासांत पार करणे शक्य होणार आहे. विश्वास नाही ना बसत? पण हे लवकरच शक्य होणार आहे. महाराष्ट्रात १५ ऑगस्टपासून ‘वंदे भारत’ एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असून पुणे - मुंबई दरम्यान ही एक्सप्रेस धावणार आहे, त्यामुळे या दोन्ही शहरांमधील अंतर कमी होणार असून प्रवाशांच्या वेळेची सुद्धा बचत होणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार असल्याची घोषणा पहिल्यांदा देशाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. यामध्ये येत्या दोन वर्षांत चारशे ट्रेन ‘वंदे भारत’ अंतर्गत सुरू करण्याचा मानस भारत सरकारकडून व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या निर्णयाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला वंदे भारत ट्रेन मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे येत्या १५ ऑगस्टपासून ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात नव्याने सुरू होणारी एक्सप्रेस ‘वंदे भारत’ सध्या राज्यातील कमी अंतरावरील शहरांमध्ये वापरण्यात येेणार आहे. त्यामध्ये एसी सुविधांसह केवळ बैठक व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले असून टप्याटप्याने एसीचे स्लीपर डबे जोडण्यात येणार आहेत आणि काही कालांतराने लांबच्या शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सज्ज होणार आहे. सध्या ही ट्रेन पुणे - मुंबई दरम्यान धावणार आहे.
आतापर्यंत पुणे - मुंबई अंतर वेगाने पार करणारी वेगवान ट्रेन म्हणून ‘डेक्कन क्वीन’ ओळखली जात होती. ही ट्रेन पुणे - मुंबई हे अंतर ३ तास १० मिनिटांमध्ये पूर्ण करत होती, मात्र आता हेच अंतर वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या अडीच तासांत पूर्ण करणार आहे.
वंदे भारत ट्रेन सुरू होण्यापूर्वी तिचे तांत्रिक स्वरूप लक्षात घेता त्याप्रमाणे रेल्वे प्रशासन कामाला लागले आहे. पुणे - मुंबई प्रवासात घाट रस्ता, चढाव मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रेनचा वेग, त्यासाठी लागणाऱ्या रेल्वे ट्रॅकची सुविधा आणि इतर तांत्रिक अडचणी या साऱ्याच बाबींवर विचार करण्यात येणार आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)