अनियमित पाणीपुरवठ्याच्या विरोधात पालिकेवर मोर्चा.

अनियमित पाणीपुरवठ्याच्या विरोधात पालिकेवर मोर्चा.

मागील तीन ते चार महिन्यापासून पिंपळेनिलख,  विशालनगर, कस्पटे वस्ती, वाकड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनियमित दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवारी) महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला.

आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता. आयुक्तांनी दोन आठवड्याची मुदत दिली असून दोन आठवड्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना प्रभागात फिरू देणार नाही असा इशारा कामठे यांनी दिला.

पिंपळेनिलख, विशालनगर, कस्पटे वस्ती भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे. हंडा मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. माजी नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, पिंपळेनिलख, विशाल नगर, कस्पटे वस्ती, वाकड येथील नागरिकांना मागील 5 वर्षापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या 5 वर्षामध्ये मी 4 वेळा आंदोलन, उपोषण करून प्रशासनाचे पाणी समस्येकडे लक्ष वेधले. त्यानंतर काही प्रमाणात पाणी सुरळीत चालू झाले. परंतु, गेल्या 4 महिन्यांपासून पुन्हा मागचेच प्रयोग चालु झाले आहेत.

करदात्या नागरीकांना कृत्रिम पाणी (Pimple Nilkh News) टंचाईला सामोरे जावे लागत आहे. आज प्रशासनाच्या हातामध्ये सर्व गोष्टी आसतानाही अशी कृत्रिम पाणीटंचाई होत आहे, ही शोकांतीका आहे. आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून चाललेला प्रकार थांबवला, तर बरं होईल. तसेच, पाणी टॅंकरची मुदत संपल्यामुळे पाणी टॅंकरही नागरीकांना मिळत नाहीत. अशा दोन्ही बाजूंनी नागरीक कोंडीत सापडले आहेत. दोन आठवड्यात आद्रा धरणातून पाणी मिळणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे दोन आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. दोन आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पाणीपुरवठा अधिकारी, लाईनमॅन यांना प्रभागात फिरून देणार नाही असा इशारा कामठे यांनी दिला.