शेतकऱ्यांना आधार; गायीच्या दूधदरात अखेर वाढ?

शेतकऱ्यांना आधार; गायीच्या दूधदरात अखेर वाढ?

शेती मुख्य व्यवसयापेक्षा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधार आहे तो दुग्ध व्यवसयाचा. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोविडमुळे घटलेली मागणी यामुळे  दूधाच्या दरात वाढ झालेली नव्हती. तर दुसरीकडे पशूखाद्याचे दर हे महिन्याकाठी वाढत आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांनी हा जोड व्यवसाय टिकून ठेवलेला आहे. त्याचे फळ आता उन्हाळा सुरु झाला की मिळाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून बाजारात लोणी व दूध बुकटीच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी दोन वर्षानंतर का होईना गायीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. सध्या गायीच्या दूधाला ३० रुपये दर मिळत असून अणखीन यामध्ये दोन रुपयांची वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे दूधाच्या दरात वाढ होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायम आहेत. पशूखाद्याचे दर हे दर महिन्याला वाढत आहेत तर दूधाचे दर हे दोन वर्षातून. त्यामुळे ही दरी कशी भरुन काढावी हा प्रश्न कायम आहे.

यामुळे वाढले गायीच्या दूधाचे दर
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे मिल्क पावडर व बटर यामध्ये तेजी आली आहे. पावडरचे दर हे १८० रुपयांवरुन आता २७० रुपये किलोंपर्यंत पोहचलेले आहेत तर दुसरीकडे लोण्यापासून तयार होणारे बटर हे २४० वरुन ३५० रुपेय किलो असे विकले जात आहे. त्यामुले खासगी डेअरीमधील पावडर व लोण्याचे साठे कमी होत आहेत. परिणामी गायीच्या दरात वाढ झाली आहे.

भविष्यात आशादायी चित्र
केवळ राज्यातच नाही तर जागतिक बाजारपेठेतही दुग्धजन्य पदार्थाच्या किमती ह्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे दूध पावडरचे दर हे प्रति किलो ९० रुपयांनी वाढलेले आहेत तर बटरचे दरात ११० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गायीचे दूध हे २८ रुपयांवरुन आता ३० रुपये लिटरवर गेले आहे. दुग्धजन्य पदार्थांना अशीच मागणी राहिली तर गायीच्या दूध दरात अणखीन वाढ होणार असल्याचे सोनाई दूध डेअरीचे गणेश शेटे यांनी सांगितले आहे.

पशुखाद्याचे असे वाढले दर
दूधाच्या दरात वाढ झाली तर ती १  किंवा २ रुपयांनी वाढ होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांमध्ये खाद्यच्या दरात दुपटीने वाढ झालेली आहे. कळण्याचे ५० किलोचे पोते हे ६०० वरुन १००० वर गेले आहेत. मक्यापासून बनवलेली कांडी ही १००० हून १४०० तर सरकी ६०० वरुन १००० वर तर खापरी पेंडीचे दर हे चार महिन्याखाली २००० वर होते तेच दर आता २७०० वर गेले आहेत. त्यामुळे मेहनत आणि खर्चाचा विचार करता शेतीचा मुख्य जोडव्यवसाय हा अडचणीत आलेला आहे.