मोठी बातमी! अखेर 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मोठी बातमी! अखेर 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 

आपल्याकडे ट्रिपल संजय आहे – शिंदे
6 खासदारांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘तुम्हाला काही प्रश्न उरायला नको म्हणून हे केलं. काही मीडियावर काय काय चालतं ना. आज सहा खासदार, नावं मघाशी घेतली. बाजूला ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय बंडू जाधव, संजय देशमुख आहे आणि नागेश आष्टीकर आहे. ट्रिपल संजय आहे. तीन संजय आपल्याकडे आहे. आमच्याकडे चौथा संजय राठोड आहे. भरपूर संजय आहे. त्यामुळे बाकी कुणाबद्दल मी बोलतोय ते सांगायची गरज नाही. ट्रिपल संजय असल्याने कुणाची गिनती नाही. 

शिवसेना हे कुटुंब आहे…
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, ‘शिवसेना हे कुटुंब आहे. परिवार आहे. खऱ्या शिवसेना परिवारात, बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेना परिवारात कट्टर शिवसैनिक खासदार सामील झाले आहेत. त्यांचं मी पक्षात स्वागत करतो. चार वर्षापूर्वी 22 जून 2022 रोजी शिवसेनेने आम्ही उठाव केला होता. तेव्हा 40 आमदार सुरुवातीला आले. त्यानंतर पुन्हा चौकार नाही, षटकार मारलेला आहे. सिक्सर. अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला. हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आपला लढा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. हिंदुत्वाच्या विचाराचा आहे.’ 

एकनाश शिंदे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘शिवसेनेचा विचार तिथे शिवसैनिक. म्हणून या सहा खासदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत, खऱ्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. काही लोकं मीडियावर काही उलट सुलट चुकीच्या बातम्या आरोप प्रत्यारोप करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो, मी सर्वांचा मान सन्मान राखेल, तुमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवेल, आपण कुटुंब म्हणून पुढची वाटचाल करू.’