शिवाजी कोण होता?’ वाद पेटला; धमकीनंतर पुस्तक विक्रीत अनपेक्षित वाढ!
दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादामुळे सध्या राज्यात चर्चेला उधाण आले आहे. या पुस्तकाच्या नावावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संबंधित प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आल्यानंतर वातावरण तापले आहे.
या प्रकरणानंतर मात्र एक अनपेक्षित घडामोड समोर आली आहे. वाद वाढताच ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पुस्तक विक्रेत्यांकडे या पुस्तकाची मागणी अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. काही दुकानांमध्ये तर हे पुस्तक तात्पुरते ‘आउट ऑफ स्टॉक’ झाल्याची माहिती समोर येत आहे.
वाचकांमध्ये या पुस्तकाबाबत उत्सुकता वाढल्याने सोशल मीडियावरही या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेक जण पुस्तक वाचून स्वतःचा निष्कर्ष काढण्याच्या भूमिकेत दिसत आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ऐतिहासिक लेखन आणि राजकीय हस्तक्षेप यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासन या प्रकरणाकडे कसे पाहते आणि पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)