दिवाळीच्या बोनसची सुरुवात कशी झाली?
उठा उठा दिवाळी आली.. बोनस घ्यायची वेळ झाली. दिवाळी आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली असताना सोशल मीडियावर आपणही दिवाळी बोनसची मीम पाहत असाल, शेअर करत असाल हो ना? पण हा दिवाळी बोनस प्रकार नक्की सुरु कसा झाला हे तुम्हाला माहित आहे का? दिवाळी म्हणजे जितकी मज्जा मस्ती तितका खर्च. वर्षातून एकदाच येणारा सण म्हणून खर्चात आखूडता हात जरा सैल सोडावा अशी आपलीही इच्छा असते पण बजेटचे आकडे काही केल्या जुळत नाहीत, अशावेळी पगाराच्या व्यतिरीक्त मिळणारी छोटी का होईना पण एक बोनस रक्कम आपली तारणहार ठरते. याच दिवाळी बोनसचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत.
आपल्याला माहित असेल पूर्वी मुंबईला गिरणगाव म्हणूनही संबोधले जात होते. कपड्याच्या, पिठाच्या या गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्याला पगार दिला जात होता. या हिशोबानुसार प्रत्येकाला ५२ आठवड्यांचे ५२ पगार मिळत होते. पण ब्रिटिश आले आणि त्यांनी आठवड्या ऐवजी महिन्याचा पगार देण्याची पद्धत सुरु केली, आता ५२ ऐवजी ४८च आठवड्यांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळू लागला. तुम्हीच हिशोब करा, जर महिन्यात ४ आठवडे आहेत तर ५२ च्या हिशोबाने १३ महिन्यांचा पगार मिळायला हवा होता पण महिन्याच्या आकडेवारीनुसार ब्रिटिशांनी १२ च महिन्याचा हिशोब सुरु केला.
जेव्हा हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन करून अन्यायावर उत्तर मागितले. १९३० ते १९४० दरम्यान ब्रिटिशांनी या १३ व्या पगाराचे वाटप कसे करायचे याबाबत कामगार नेत्यांशी चर्चा केली. यात त्यांनी दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असल्याने त्या महिन्यात १३ वा पगार बोनस म्हणून देण्याचे ठरवले. ३० जून १९४० पासून याची अंमलबजावणी करण्यात आली.
अलीकडे काही कंपनी या दिवाळी बोनस देण्यासाठी टाळाटाळ करतात पण अशावेळी तुमचा हा हक्क त्यांच्या लक्षात आणून द्या. दिवाळीच्या तुम्हाला बोनस भरभरून शुभेच्छा!




Comments (0)
Facebook Comments (0)