बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज भरता येणार

बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज भरता येणार

राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि अन्य लेखी परीक्षेसाठी शुक्रवारी १२ नोव्हेंबरपासून अर्ज भरता येणार आहेत. यासाठी नियमित विद्यार्थ्यांना २ डिसेंबरपर्यंत विनाशुल्क तर आणि त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार, ३ ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत.

विलंब शुल्कासह हे अर्ज १३ ते २० डिसेंबर २०२१ या कालावधीत भरता येतील. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी १२ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ असा आहे.